चाळीसगाव नगरपालिकेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे दुर्लक्ष; प्रजासत्ताक दिनी अभिवादन न केल्याने नागरिकांनी दिले स्मरणपत्र
- gramasthlive
- Jan 30
- 1 min read
चाळीसगाव : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला प्रजासत्ताक दिनी अभिवादन करण्यास विसरल्याबद्दल चाळीसगाव येथील सजग नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला स्मरणपत्र देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. २६ जानेवारी रोजी साजऱ्या झालेल्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन देखील करण्यात आले, मात्र या नियोजित कार्यक्रमात जवळच असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याचा प्रशासनाला विसर पडला. ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी सम्राट सोनवणे आणि सागर नागणे या तरुणांनी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नसून ते महान विधितज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि मानवाधिकार समर्थक होते, त्यामुळे प्रजासत्ताक दिनी त्यांचे स्मरण करणे हे घटनात्मक मूल्यांचा सन्मान करण्यासारखे आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन भविष्यात होणाऱ्या १५ ऑगस्ट, २६ जानेवारी किंवा इतर राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन करण्याचा कार्यक्रम अधिकृतरीत्या समाविष्ट करावा, तसेच अशा प्रसंगी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी या स्मरणपत्राद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनातील नव्या पदभाराचा किंवा कामाचा व्याप यामुळे ही चूक अनवधानाने झाली असावी, असा समंजस सूर नागरिकांनी लावल्याने या पत्राची शहरात मोठी चर्चा होत आहे.
ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोर्वेकर बातमीसाठी संपर्क बबलु आहिरे चाळीसगाव




Comments